मनोगत …..

बाबांना जावून अकरा वर्षे झाली. बाबा निवृत्तीनंतरही कार्यात राहिले. मनाला लावून कार्य करण्याची सवय असल्यामुळे आणि कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही उपक्रमात झोकून देवून, झपाटूनच कार्य करण्याची वृत्ती असल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना त्यांची आवडीची कामे करण्यासाठी अधिकच हुरूप आला. ते शिक्षणविषयक सामाजिक कार्यात प्रत्यक्ष कार्यरत राहिले. योगेश्वरी शिक्षण संस्था आणि विशेषत: तिथली अभिजात शिक्षण परंपरा यांबद्दल त्यांच्या मनात  विलक्षण निष्ठा, आदर, कृतज्ञता होती. रेणापूर तालुक्यातील पानगाव या खेडेगावाहून आल्यानंतर जे शिक्षण मिळाले, जे संस्कार झाले आणि ज्यामुळे आपण एक उत्तम शिक्षक, नंतर विस्तार अधिकारी आणि शेवटी जि. प. कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक होवू शकलो, याचे या संस्थेचे ऋण कसेकसे फेडावे आणि त्याचबरोबर जवळून शिक्षण क्षेत्र पाहत, तपासत असताना या संस्कारांची शिदोरी कुठ कुठवर पोचवणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी धडपड करण्याचे त्यांचे इप्सित त्यांनी साकारायला सुरुवात केली.

नानासाहेब गाठाळ काका, पी. एस. कुलकर्णीकाका, व्ही. एन. कुलकर्णी काका, प्राचार्य दादाहरी कांबळे सर अशा ज्येष्ठांसह कितीतरी तरुण मंडळी त्यांच्या या दक्ष, मनमिळावू कार्यपद्धतीला पाहून त्यांच्यासोबत राहिली. उदय आसरडोहकर, अविनाश मुडेगावकर, तानाजी देशमुख, आनंद टाकळकर, संजय जड अशी कितीतरी तरुण मंडळी निष्ठेने त्यांच्यासोबत त्यांना मान देत राहिली. अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष,  बिनीचे राजकीय नेते, माझे वर्गमित्र राहिलेले, मा. राजकिशोर मोदी यांच्या संस्थेत तर त्यांनी स्वयंस्फूर्तीने जे काम केले, त्याला राजकिशोर मोदी यांनी दिलेला प्रतिसाद अतिशय मोलाचा होता. अन्यथा, जि. प. शाळांच्या वातावरणातून निवृत्त झालेल्या या अधिकाऱ्याचा आपल्या संस्थेतला नि:स्वार्थ सहभागही एखाद्या खाजगी शिक्षण संस्था चालकास हस्तक्षेप वाटण्याची शक्यता होती. पण बाबांनी त्यांना अनेक धोरणात्मक बाबींत जे सहकार्य केले, जे मोलाचे मार्गदर्शन केले, योग्य सल्ला व प्रसंगी प्रत्यक्ष सहकार्य केले, याचे स्मरण त्यांनी ठेवले आणि त्यांना मूकबधीर विद्यालयात व इतरही घटक संस्थांत अनौपचारिकपणे सामील करून घेतले. त्या विद्यालयांतील शिक्षकांनीही बाबांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार केला आणि त्यांना कामाचा आनंद दिला. विशेषत: मूकबधीर विद्यार्थ्यांची त्यांना विशेष कणव येत असे. निसर्गाने ध्वनीशी ज्यांचे नातेच तोडले आहे अशा दुर्दैवी, निष्पाप मुलांच्या चेहऱ्यावरील केविलवाणेपण त्यांना बेचैन करीत असे. त्यांच्यासाठी त्यांनी जमेल तसे प्रत्यक्षाप्रत्यक्ष कार्य केले.

त्यांची धडपड बांधिलकीने स्मरणात ठेवून, त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या सामाजिक योगदानाची प्रेरणा कायम ठेवण्याच्या हेतूने कार्य करायचे ठरवले. पहिल्या स्मृतिदिनानिमित्त बाबांनी दै. ‘विवेकसिंधु’ या स्थानिक वृत्तपत्रातून सदोदित जे लिखाण बांधिलकीने, पोटतिडीकीने व हक्काने केले, त्या लिखाणाचे संकलन केलेल्या – ‘शिक्षणसिंधु’ व ‘प्रभासकिरणे’ – या दोन ग्रंथांचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या उपस्थितीत, विचारवंत जयदेव डोळे यांच्या हस्ते केले. यांपैकी, ‘शिक्षणसिंधु’ हा ग्रंथ तर शिक्षण खात्याने शिफारस केलेल्या पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे. दुसऱ्या वर्षी त्यांच्या ‘विवेकानंदांचे शैक्षणिक विचार’ या पुस्तिकेचे परळी येथील आमचे स्नेही व लोकप्रिय उदारमतवादी राजकीय नेते बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते केले.

त्यानंतर काही वर्षे आम्हाला निर्विवाद आदर्श वाटलेल्या, विशेषत: ग्रामीण भागातून निष्ठेने कार्य करणाऱ्या, कधी कुणी सन्मानित केले नव्हते, आणि तरीही त्यांच्या निष्ठा त्यामुळे कोमेजल्या नव्हत्या अशा शिक्षकांचे सन्मान, सत्कार मान्यवरांच्या हस्ते आम्ही केले. शिक्षक संघटनेच्या स्थापनेपासून बाबांचे आवडते मित्र माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख, अमर हबीब, अनिरुद्ध जाधव, मधुकरराव गायकवाड अशा नामांकित व्यक्तींच्या हस्ते हे सत्कार केले. त्यानिमित्ताने ग्रामीण भागात आपली आपली सेवाही निष्ठेने आणि सर्वार्थाने देणाऱ्या बाबांच्या आणि बाबांसारख्या अनेकांच्या कार्याचा परिचय या मान्यवरांना व्हावा, हाही उद्देश्य त्यामागे निश्चितच होता. कारण, जिवंत असताना बाबा जरी शिक्षकांच्या प्रेमाचे, आदराचे स्थान राहिले होते, तरी मान्यवरांनी कधी त्यांना ओळखले नव्हते. ही खंत त्यांच्या मनात जरी नव्हती, तरी आम्हा कुटुंबियांना आणि त्यांच्या गाठाळ काका, पी. एस. काका यांच्यासारख्या अत्यंत जवळच्या मित्रांना, सहकाऱ्यांना निश्चितच होती. म्हणून आमच्या अशा उपक्रमांत ते सतत पाठीशी असतात. त्यानिमित्ताने या मान्यवरांचे मोलाचे विचार दर्शनही होत असे.

मात्र, व्याख्यानांना वरचेवर अनुत्सुक होत चाललेली उपस्थिती पाहता  दरवर्षी मग जोधाप्रसाद मूक बधीर विद्यालयात बाबांच्या स्मृतीदिनाच्च्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

व्यक्ती गेली कि तिचे कार्यही जाते, विस्मरण होते. असे आमच्या निर्मळ मनाने काम करणाऱ्या  बाबांचे आणि त्याचबरोबर त्यांच्यासारख्या अंधारात राहून आपले काम निष्ठेने, संवेदनेने करणाऱ्या असंख्यांचे न व्हावे, त्यांची तळमळ रहावी या हेतूने हा परिपाठ आम्ही श्राद्धादि प्रथांना डावलून ठेवला आहे. याच हेतूने अगोदर बाबांच्या नावे स्मृती समारोह समिती या नावाने एक ट्रस्ट स्थापण्याचाही संकल्प केला. त्याचेच अधिकृत रूप म्हणजे ‘सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान’. बाबांनी त्यांचे बालपण त्यांच्या ज्या जन्मगावी व्यतीत केले, त्या गावीच – पानगावी (तां. रेणापूर जि. लातूर) – या प्रतिष्ठानचे मुख्यालय केले. त्यानिमित्ताने आमचीही आमच्या मातीशी नाळ परत जोडली जाईल आणि आसपासच्या खेड्यांशी आपल्याला जोडून घेता येईल हाही त्या मागे उद्देश.

या भागातील – विशेषत: ग्रामीण भागातील – समस्या कोणत्या आहेत आणि त्यावर प्रबोधन, सहभाग आणि सहकार्य या त्रिसूत्रीने, तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या साथीने कहीतरी करता येईल हाही मानस आहे. मुख्य उद्देश्य सर्वंकष शिक्षणचळवळीस साह्यभूत प्रतिष्ठानचे कार्य असावे, हा असला तरी शिक्षण हे सामाजिक प्रश्नापासून वेगळे करता येत नाही. आपल्या समाजात तर अनेकविध घटकांनी शिक्षण प्रभावित होत असते. अनेक पातळ्यांवर त्याचा विचार करावा लागतो. त्यात अगदी वरकरणी असंबद्ध वाटणाऱ्या आरोग्य, कृषि, व्यवसाय, भौगोलिक वातावरण व सांस्कृतिक जडणघडण अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्यामुळे अनेक आव्हानेही उभी राहतात. त्यात आपल्याही स्नेहपूर्ण अनुबंधाने आणखीही खूप काही करता येईल. बघू काय काय जमतं ते ! सहकार्य असू द्या, एवढीच नि:संकोच मागणी आहे.

                                                                                                                                              – प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी                                                                                                                                                            सचिव,                                                                                                                                                                          सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान,                                                                                                                                  पानगाव, ४३१ ५२२ ता. रेणापूर, जि. लातूर